yuva MAharashtra डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा संपन्न - BV DPKM News

Header Ads

Loknyay Marathi

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा संपन्न

 डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत कार्यशाळा संपन्न



सांगली: शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि भारती विद्यापीठाचे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रणी महाविद्यालयांतर्गत 'मानवी मूल्ये' या विषयावर  कार्यशाळा संपन्न झाली‌. या प्रसंगी प्रमुख पाहुणे व विषय तज्ज्ञ प्रा. चंद्रकांत खंडागळे व श्री. राहुल थोरात यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. पोरे होते.



या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करीत असताना प्रा. चंद्रकांत खंडागळे म्हणाले की, सध्या भारतात धर्माच्या नावाखाली परधर्माचा व्देष मोठ्या प्रमाणात पसरवला जात आहे. त्यामुळे धार्मिक मूल्यापेक्षा मानवी मूल्यं ही आपल्या जगण्यासाठी अधिक महत्वाची आहेत. सत्य, अहिंसा, शांतता, प्रामाणिकपणा, सहकार्य, प्रेम आणि आदर ही काही सामान्य मानवी मूल्ये आहेत. भारतीय संविधानात या सर्वमूल्यांसोबत स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुभाव, मानवीप्रतिष्ठा, मानवाधिकार इ.चा समावेश आहे. या मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी संविधानाने अनेक कायदे आणि प्रशासकीय व्यवस्था निर्माण केल्या आहेत.

या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात  अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पूर्णवेळ कार्यकर्ते श्री. राहुल थोरात  म्हणाले की, मानवी मूल्ये म्हणजे समाज नैतिक राहण्यासाठी आवश्यक असलेली तत्त्वे आणि विश्वास होय. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे याद्वारे मानवी मूल्यांचे रक्षण केले जाते. भारतीय संविधानाचा गाभा म्हणजे मानवी मूल्यांचे रक्षण आणि संवर्धन करणे हा आहे असे मत व्यक्त केले.    

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ.एस.व्ही.पोरे म्हणाले की, सध्या जगामध्ये मानवी हक्कांची व मूल्यांची पायमल्ली होत आहे, यातून धार्मिक, जातीय दंगली घडत आहेत. म्हणूनच मानवी हक्क व मूल्ये यांची व्यावहारिकता सर्वांनी जपली पाहिजे. मानवी मूल्ये व्यवहारात आणून नैसर्गिक हक्कांची जोपासना केली  तरच खऱ्या अर्थाने मानवी हक्कांचे व मूल्यांचे संवर्धन होईल असे प्रतिपादन केले.       

यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. अमित सुपले, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. अरुण जाधव, प्रमुख अग्रणी महाविद्यालय समन्वयक डॉ.आर. एन. देशमुख, अग्रणी महाविद्यालय समितीचे समन्वयक प्रा. सतिश कांबळे, कार्यशाळा समन्वयक डॉ.वर्षा कुंभार व प्रा.नलेश बहिरम आदि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.आर. एन. देशमुख यांनी केले. तसेच प्रा. सतिश कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन डॉ.वर्षा कुंभार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. मंगेश गावीत यांनी केले तर या कार्यशाळेस अग्रणी महाविद्यालयांतर्गत  येणाऱ्या सर्व महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(Bharati Vidyapeeth's Dr. Patangrao Kadam Mahavidyalaya, Sangli)